एस. एम. जोशी कॉलेजमध्ये महात्मा जोतिराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर व्याख्यान व ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन
डॉ.अतुल चौरे : हडपसर
प्रतिनिधी / हडपसर / दि. १३ एप्रिल २०२६
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि एस. एम. जोशी कॉलेज, हडपसर येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभाग व ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथ प्रदर्शन व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या १९९ व्या जयंतीनिमित्त तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. (डॉ.) दिनकर मुरकुटे उपस्थित होते. त्यांनी “महात्मा जोतिराव फुले यांचे साहित्य : विशेष संदर्भ ‘गुलामगिरी’” या विषयावर मार्गदर्शन करताना सांगितले की, ब्रिटिश काळात भारतीय समाजात वर्णव्यवस्था व जातीव्यवस्था खोलवर रुजलेली होती. अशा परिस्थितीत महात्मा फुले यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्य केले. तृतीय रत्न, गुलामगिरी, ब्राह्मणांचे कसब यांसारख्या ग्रंथांद्वारे त्यांनी सामाजिक विषमता, अन्यायकारक रचना आणि अंधश्रद्धा यांवर प्रखर टीका केली.
धनंजय किर यांच्या मतानुसार “फुले हे सामाजिक क्रांतीचे जनक आहेत,” हे उद्धृत करत त्यांनी फुले यांच्या कार्याचे महत्त्व अधोरेखित केले. फुले यांनी मिथक कथांच्या माध्यमातून समाजाचे विश्लेषण करून लोकजागृती केली. भारतीय समाजातील मानसिक गुलामगिरीचे वास्तव त्यांनी प्रभावीपणे मांडले. धर्मग्रंथांच्या आधारे व्यक्तीला गुलाम बनविण्यात आले आणि समाजावर नियंत्रण ठेवण्यात आले, असे त्यांनी स्पष्ट केले. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांचा त्यांनी पुरस्कार केला. असे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य प्रा. (डॉ.) एकनाथ मुंढे यांनी “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य : विचार, चिंतन आणि परिवर्तन” या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, आंबेडकर यांच्या विचारांनी भारतीय समाजात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणले आहे. प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी उच्च शिक्षण घेतले आणि परदेशात जाऊन ज्ञानसंपादन केले, ही बाब अत्यंत प्रेरणादायी आहे.
आंबेडकर यांच्या अभ्यासू वृत्तीचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, त्यांनी आयुष्यभर ज्ञानसाधना केली. पन्नास ते साठ हजार पुस्तकांचा मोठा संग्रह त्यांनी उभारला होता. त्यांच्या संशोधक वृत्तीमुळे त्यांनी समाजहितासाठी अनेक कार्ये केली. शिक्षण हे प्रगतीचे प्रभावी साधन आहे, असे त्यांनी अधोरेखित केले. “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे” असे सांगत त्यांनी शिक्षणातून आत्मविश्वास निर्माण होतो, असे स्पष्ट केले. “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा त्यांचा संदेश आजच्या पिढीसाठीही तितकाच प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.
विद्यार्थी व प्राध्यापक यांच्यासाठी ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन ग्रंथपाल प्रा. शोभा कोरडे यांनी केले. यावेळी आय. क्यू. ए. सी. समन्वयक प्रा. संजय अहिवळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी डॉ. ज्योती किरवे यांनी पाहुण्यांची ओळख डॉ. अतुल चौरे यांनी करून दिली. आभार प्रदर्शन प्रा. अजित जाधव यांनी केले, तर सूत्रसंचालन डॉ. नम्रता कदम यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रंथ प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांना फुले व आंबेडकर यांच्या साहित्याचा अभ्यास करण्याची संधी मिळाली. एकूणच, हा कार्यक्रम विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, वाचनाची आवड आणि विचारप्रवृत्ती वाढविणारा ठरला.

✍🏻मुख्य संपादक – सुभाष कदम
























