एस. एम. जोशी कॉलेजमध्ये रयत माऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या ९६ व्या पुण्यतिथीनिमित्त विशेष व्याख्यान
डॉ. अतुल चौरे : हडपसर
प्रतिनिधी / हडपसर / दि. १८ मार्च २०२६
रयत शिक्षण संस्थेच्या एस. एम. जोशी कॉलेज, हडपसर, पुणे-२८ येथील सांस्कृतिक विभागाच्या वतीने रयत माऊली सौ. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या ९६ व्या पुण्यतिथीनिमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम बुधवार, दि. १८ मार्च २०२६ रोजी महाविद्यालयात उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून इंग्रजी विभागप्रमुख डॉ. मृणालिनी आहेर उपस्थित होत्या, तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. (डॉ.) एकनाथ मुंढे होते.
यावेळी बोलताना डॉ. मृणालिनी आहेर यांनी सांगितले की, रयत शिक्षण संस्था ही त्याग व समर्पणाच्या पायावर उभी आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याइतकेच लक्ष्मीबाई (लक्ष्मी वहिनी) यांचे योगदान मोलाचे आहे. त्यांनी सुमारे ८० तोळे दागिने संस्थेसाठी अर्पण करून गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी हातभार लावला. त्यांच्या त्याग, समर्पण व सेवाभावातून प्रेरणा घेऊन समाजासाठी कार्य करणे आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले. तसेच अहिल्याबाई होळकर, ताराराणी भोसले, सावित्रीबाई फुले आणि रमाबाई रानडे यांच्या कार्याचा संदर्भ देत महिलांनी स्वाभिमानी, स्वावलंबी व आत्मविश्वासाने समाजात वावरावे, असा संदेश त्यांनी दिला.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य प्रा. (डॉ.) एकनाथ मुंढे यांनी रयत शिक्षण संस्था ही केवळ संस्था नसून एक व्यापक सामाजिक चळवळ असल्याचे सांगितले. प्रतिकूल परिस्थितीत उभी राहिलेली ही संस्था ग्रामीण भागातील बहुजन समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देत आहे. दरवर्षी सुमारे पाच लाख विद्यार्थी शिक्षण घेत असून, वीस हजार सेवक संस्थेच्या कार्यात योगदान देत आहेत. कर्मवीर भाऊराव पाटील व रयत माऊली यांच्या त्यागमय विचारांचे अनुकरण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. मृणालिनी आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख उपप्राचार्य प्रा. (डॉ.) दिनकर मुरकुटे यांनी करून दिली, तर आभार प्रदर्शन डॉ. अतुल चौरे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. छाया सकटे यांनी केले.
यावेळी उपप्राचार्य प्रा. (डॉ.) किशोर काकडे तसेच IQAC समन्वयक प्रा. संजय अहिवळे उपस्थित होते. कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

✍🏻मुख्य संपादक – सुभाष कदम
























