एस. एम. जोशी कॉलेजमध्ये एक दिवसीय राष्ट्रीय परिषद संपन्न
डॉ.अतुल चौरे : हडपसर
हडपसर, दि. २८ मार्च २०२६
रयत शिक्षण संस्थेचे, एस. एम. जोशी कॉलेज, हडपसर (पुणे) येथील इतिहास विभाग, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी प्रतिष्ठान, वाई (जि. सातारा) आणि प्रागतिक इतिहास संस्था, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या शतकोत्तर रौप्य जयंतीनिमित्त “भारतीय प्रबोधन आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी” या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन शनिवार, दि. २८ मार्च २०२६ रोजी करण्यात आले. यावेळी जेष्ठ इतिहासकार जयसिंगराव पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर महात्मा ज्योतीराव फुले यांच्या सत्य सर्वांचे आदी घरं या अखंडाने परिषदेची सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून डॉ. सुनीलकुमार लवटे (कोल्हापूर), अध्यक्ष म्हणून डॉ. पंडितराव टापरे (अध्यक्ष, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी प्रतिष्ठान, वाई), तर बीजभाषक म्हणून प्रा. (डॉ.) उमेश बगाडे (माजी इतिहास विभाग प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ, औरंगाबाद) उपस्थित होते. सन्माननीय उपस्थितीमध्ये डॉ. नारायण भोसले (अध्यक्ष, प्रागतिक इतिहास संस्था, महाराष्ट्र; इतिहास विभाग प्रमुख, मुंबई विद्यापीठ) यांचा समावेश होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रो. डॉ. एकनाथ मुंढे (प्राचार्य, एस. एम. जोशी कॉलेज, हडपसर) होते.

उद्घाटक डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी आपल्या भाषणात तर्कतीर्थ हे सर्व जाती-धर्मातील लोकांना समानतेने स्वीकारणारे विचारवंत होते, असे सांगितले. त्यांनी धर्मसुधारणेद्वारे समाजाला स्वातंत्र्याच्या दिशेने नेले आणि कोळी आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी सत्याग्रह उभारले. धर्माची चिकित्सक दृष्टी आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बीजभाषक प्रा. (डॉ.) उमेश बगाडे यांनी भारतीय प्रबोधन काळात व्यक्तिस्वातंत्र्य व समानतेचा विचार महत्त्वाचा ठरला, असे सांगितले. इतिहास हा परिवर्तनशील असून आधुनिकता विविध संदर्भांत बदलत गेली आहे. भारतातील आधुनिकतेची सुरुवात ब्रिटिश राजवटीत झाली, असे त्यांनी नमूद केले.
अध्यक्ष प्राचार्य, डॉ. एकनाथ मुंढे यांनी तर्कतीर्थांचा विचार हा केवळ चळवळ नसून एक व्यापक वैचारिक प्रवाह असल्याचे सांगितले. विविध धर्म समजून घेत त्यातील चांगल्या-वाईट बाबींचा चिकित्सक अभ्यास करणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
परिषदेमध्ये विविध सत्रांचे आयोजन करण्यात आले.
पहिले सत्र: “भारतीय प्रबोधन आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी” व्याख्याते प्रा. डॉ. नवनाथ रासकर, डॉ. वैजयंती बेलसरे, प्रा. सचिन गरुड अध्यक्ष प्रा. प्रकाश सिरसट
दुसरे सत्र: “तर्कतीर्थांची धर्मसमीक्षा” व्याख्याते प्रा. (डॉ.) उमेश बगाडे, प्रा. (डॉ.) बाळासाहेब केंदळे अध्यक्ष डॉ. नारायण भोसले
तिसरे सत्र: “तर्कतीर्थांचा विचारव्यूह” व्याख्याते प्रा. देवेंद्र इंगळे, सर्फराज अहमद, कॉ. किशोर ढमाले, प्रा. (डॉ.) जगदीश सोनवणे अध्यक्ष प्रा. (डॉ.) सुरेंद्र जोंधळे
समारोप सत्रासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सुनीलकुमार लवटे, प्रा. (डॉ.) उमेश बगाडे उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी डॉ. एकनाथ मुंढे होते. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. (डॉ.) दिनकर मुरकुटे, प्रा. गजानन घोडके व प्रा. दिपक गायकवाड यांनी काम पाहिले. पाहुण्यांचा परिचय प्रा. (डॉ.) दिनकर मुरकुटे यांनी करून दिला. सूत्रसंचालन डॉ. छाया सकटे व डॉ. शीतल चौरे यांनी केले. या परिषदेस विविध महाविद्यालयांतील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

✍🏻मुख्य संपादक – सुभाष कदम
























