रयत शिक्षण संस्थेच्या एस. एम. जोशी कॉलेजमध्ये उपमुख्यमंत्री ना. स्व. अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली
प्रतिनिधी | हडपसर, पुणे | दि. ६ फेब्रुवारी २०२६
डॉ.अतुल चौरे : हडपसर
रयत शिक्षण संस्थेचा पश्चिम विभाग, पुणे यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य मा. ना. स्व. अजितदादा पवार साहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले.
ही शोकसभा सकाळी ११.०० वाजता रयत शिक्षण संस्थेचे एस. एम. जोशी कॉलेज, हडपसर, पुणे येथे पार पडली. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेस पुष्प अर्पण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर श्रद्धांजली अर्पण करून शोकसभेची सुरुवात करण्यात आली.
या शोकसभेला प्रमुख मान्यवर म्हणून चंद्रकांत दळवी IAS Retd. (चेअरमन, रयत शिक्षण संस्था, सातारा) ऍड. राम कांडगे (माजी उपाध्यक्ष, रयत शिक्षण संस्था, सातारा), आमदार चेतन (दादा) तुपे पाटील (चेअरमन, पश्चिम विभाग, रयत शिक्षण संस्था, सातारा) दिलीप (आबा) तुपे पाटील ( जनरल बॉडी सदस्य, रयत शिक्षण संस्था, सातारा), अमर तुपे ( सदस्य, महाविद्यालय विकास समिती), प्राचार्य डॉ. डी. डी. पाटील (माजी सहसचिव, रयत शिक्षण संस्था, सातारा), संजय मोहिते ( विभागीय अधिकारी, पश्चिम विभाग, पुणे), झाकीरभाई पठाण, अरविंद जगदाळे प्राचार्य डॉ. एकनाथ मुंढे यांनी उपमुख्यमंत्री ना स्व. अजितदादा पवार साहेबांना आदरांजली अर्पण करून त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक व सार्वजनिक जीवनातील योगदानाचा भावपूर्ण शब्दांत गौरव केला.

चंद्रकांत दळवी (निवृत्त IAS) यांनी आपल्या मनोगतात रयत शिक्षण संस्थेच्या धोरणात्मक निर्णयांमध्ये अजितदादांचा मोलाचा आणि निर्णायक वाटा अधोरेखित केला. रयत शिक्षण संस्थेचा सर्वांगीण कायापालट घडवून आणण्यात दादांचे योगदान अमूल्य असल्याचे त्यांनी नमूद केले. नवीन प्रशासकीय इमारतींपासून ते शैक्षणिक संकुलांच्या बांधकामापर्यंत त्यांच्या दूरदृष्टीचा ठसा स्पष्टपणे दिसून येतो. त्यांच्या कार्यकाळात रयत शिक्षण संस्थेला भक्कम पायाभूत सुविधा मिळाल्या, असेही त्यांनी सांगितले. अजितदादांची काम करण्याची शिस्तबद्ध पद्धत आणि निर्णय घेण्यातील ठामपणा उल्लेखनीय होता. ते महाराष्ट्र राज्याचे तसेच रयत शिक्षण संस्थेचे खरे आधारस्तंभ होते. त्यांच्या जाण्याने रयत शिक्षण संस्थेचा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा आधारवड आणि लोकनेता आपण गमावला, अशी तीव्र खंत त्यांनी व्यक्त केली. जनमानसावर प्रेम करणारा, निसर्गाशी नाते जपणारा आणि तोलून-मापून बोलणारा लोकनेता आपण गमावल्याने समाजाची व राज्याची मोठी हानी झाल्याचे मत त्यांनी आपल्या मनोगतातून मांडले.
आमदार चेतन (दादा) तुपे पाटील यांनी शिव–फुले–शाहू–आंबेडकर यांच्या विचारधारेतून कार्य करणारा, दिलेला शब्द पाळणारा, कामावर पकड असलेला आणि वेळेचे भान जपणारा दरारी नेता हरपल्याची भावना व्यक्त केली.
ऍड. राम कांडगे यांनी चेहरा पाहून भावना ओळखणारा, संस्थेची ध्येयधोरणे काटेकोरपणे राबवणारा व सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणारा नेता गेल्याचे दुःख व्यक्त केले.
यावेळी दिलीप (आबा) तुपे, झाकीरभाई पठाण, अरविंद जगदाळे, प्राचार्य डॉ. नानासाहेब गायकवाड, प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी दादांच्या आठवणींना उजाळा दिला. शोकसभेची सांगता विनम्र अभिवादनाने करण्यात आली.
या प्रसंगी पुणे विभागातील सर्व प्राचार्य, साधना शैक्षणिक संकुलातील प्राचार्य, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण परिसरात शोकमय वातावरण निर्माण झाले होते.

✍🏻मुख्य संपादक – सुभाष कदम
























