शरदचंद्रजी पवार यांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त
एस. एम. जोशी महाविद्यालयात व्याख्यानाचे आयोजन
डॉ.अतुल चौरे : हडपसर
प्रतिनिधी | हडपसर, पुणे | दि. १७ डिसेंबर २०२५
रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पद्मभूषण खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त एस. एम. जोशी महाविद्यालय, हडपसर येथे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध लेखक व महात्मा फुले महाविद्यालय, पिंपरी येथील माजी इंग्रजी विभागप्रमुख डॉ. दीपक बोरगावे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रो. डॉ. किशोर काकडे होते.

“माजी खासदार शरदचंद्रजी पवार यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व” या विषयावर बोलताना डॉ. दीपक बोरगावे म्हणाले की, “शरद पवार नावाचा माणूस संवादातून घडला आणि समाजालाही घडवणारा ठरला.” त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांचा शैक्षणिक वारसा पुढे नेत रयत शिक्षण संस्थेमार्फत बहुजन समाजातील असंख्य विद्यार्थ्यांना शिक्षण व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. शरद पवार यांनी कृषी मंत्री असताना शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन उत्पादन वाढविले, परकीय निर्यात वाढीस लावली तसेच कमी पाण्यावर शेती कशी करावी याचे तंत्रज्ञान भारतात आणले. फळबाग शेती, दूध उत्पादन आणि सहकार क्षेत्रात त्यांनी तंत्रज्ञानाच्या आधारे लोकांना सक्षम व्यवसायाची संधी दिली. किल्लारीचा भूकंप, मुंबई बॉम्बस्फोट किंवा दंगलीसारख्या संकटाच्या प्रसंगी शरद पवार अग्रभागी राहून प्रभावी आपत्ती व्यवस्थापन करीत असत, असेही बोरगावे यांनी नमूद केले. संरक्षण मंत्री असताना त्यांनी विविध देशांचे दौरे करून विज्ञान-तंत्रज्ञानाचा अभ्यास केला व त्याचा भारतातील औद्योगिक विकासासाठी उपयोग केला, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात उपप्राचार्य प्रो.डॉ. किशोर काकडे म्हणाले की, शरदचंद्रजी पवार यांचे व्यक्तिमत्त्व खऱ्या अर्थाने बहुआयामी आहे. त्यांनी महिलांसाठी आरक्षणाची प्रभावी अंमलबजावणी करून समान संधी मिळवून दिल्या. तळागाळातील गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. विविध देशांतील विज्ञान-तंत्रज्ञान भारतात आणून अनेक तरुणांना रोजगार व व्यवसायाच्या संधी मिळवून दिल्या, असे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत प्रो. डॉ. दिनकर मुरकुटे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. छाया सकटे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. अतुल चौरे यांनी केले. या प्रसंगी उपप्राचार्य प्रो. डॉ. एकनाथ मुंढे, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

✍🏻मुख्य संपादक – सुभाष कदम
























