एस. एम. जोशी कॉलेजमध्ये राज्यस्तरीय महाविद्यालयीन प्रश्नमंजूषा स्पर्धेचा उद्घाटन समारंभ संपन्न
डॉ.अतुल चौरे
प्रतिनिधी / १६ जानेवारी / हडपसर
रयत शिक्षण संस्था, कर्मवीर विद्याप्रबोधिनी,सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील राज्यस्तरीय महाविद्यालयीन प्रश्नमंजूषा स्पर्धेचा उद्घाटन समारंभ एस. एम. जोशी कॉलेज, हडपसर येथे उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी दत्तात्रय खाडे तर अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. एकनाथ मुंढे उपस्थित होते. तसेच कर्मवीर विद्याप्रबोधिनीचे विभागप्रमुख एम. डी. साळुंखे, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य अरविंद तुपे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना दत्तात्रय खाडे यांनी स्वतःचा संघर्षमय आणि प्रेरणादायी जीवनप्रवास मांडला. समाज कल्याण वसतिगृहात राहून त्यांनी शिक्षण पूर्ण केले. तरुणपणी भरत आंधळे आणि विश्वास नांगरे-पाटील यांची व्याख्याने ऐकल्यानंतर स्पर्धा परीक्षांकडे त्यांचा कल वाढला.
रयत शिक्षण संस्थेच्या शिवाजी कॉलेजमध्ये केवळ दहा रुपयांमध्ये प्रवेश मिळाल्याने त्यांचा शैक्षणिक प्रवास सुरळीतपणे सुरू राहिला. शिक्षणाबरोबरच त्यांनी सिक्युरिटीचे काम आणि सामाजिक कार्यही केले. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी मंत्रालय लिपिक, तलाठी, करसहायक, भूमी अभिलेख विभाग, तसेच राजपत्रित वर्ग–२ अधिकारी या पदांवर काम करत अखेर गटविकास अधिकारी (BDO), वर्ग–१ पद मिळवले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोलताना प्राचार्य प्रो. डॉ. एकनाथ मुंढे म्हणाले, की, “विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची ओळख होणे अत्यंत गरजेचे आहे. अशा प्रश्नमंजूषांमधून अनेक विद्यार्थी घडून अधिकारी बनतात. आपल्या संस्थेतूनच एक सर्वसामान्य विद्यार्थी अधिकारी होऊन पुन्हा प्रमुख पाहुणा म्हणून येणे ही मोठी अभिमानाची गोष्ट आहे.” ते पुढे म्हणाले, “विद्यार्थ्यांनी प्रत्येक स्पर्धेची तयारी पद्धतशीर करावी. स्पर्धा ही आपल्याला आत्मपरीक्षण करायला भाग पाडते आणि त्यातून नवीन संधी निर्माण होतात.”
कार्यक्रमासाठी आय.क्यू.ए.सी. समन्वयक प्रा.संजय अहिवळे, उपप्राचार्य प्रो.डॉ.किशोर काकडे, उपप्राचार्य डॉ.संजय जगताप उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत डॉ.अतुल चौरे यांनी केले. तर आभारप्रदर्शन उपप्राचार्य प्रो.डॉ.दिनकर मुरकुटे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.छाया सकटे, डॉ.नम्रता कदम, डॉ.अर्चना पाटील तसेच विद्यार्थ्यांनी उत्साहाने केले.
राज्यभरातील विविध महाविद्यालयांमधील विद्यार्थी आणि प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने प्रश्नमंजूषा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

✍🏻मुख्य संपादक – सुभाष कदम
























